टेट परीक्षेसाठी शहरात आलेल्या भावी शिक्षकाचा खून; रिक्षाचालकाने केले चाकूने सपासप वार
टेट परीक्षेसाठी शहरात आलेल्या भावी शिक्षकाचा खून; रिक्षाचालकाने केले चाकूने सपासप वार
छत्रपती संभाजीनगर
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या भावी शिक्षकावर रिक्षाचालकाने केलेल्या चाकूहल्ल्यात त्याचा खून झाला असून छावणी भागातील आयकर कार्यालयासमोर ही घटना घडली. जयराम बबन पिंपळे (२८, रा. वडाळा महादेव पिंपळे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे.
अहिल्यानगर येथे राहणारे जयराम शिक्षक पात्रता फेरीच्या परीक्षेसाठी शहरात आले होते. त्यावेळी पहाटे बाबा पेट्रोलपंप येथून वाळूजकडे असलेल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रिक्षात बसले होते. त्यांनी लवकर जायचे असल्याने एकच प्रवासी घ्या, असे सुरवातीला सांगितले. मात्र, काही वेळाने तुम्हाला अजून काही प्रवासी घ्यायचे असतील तर घेऊ शकता, असे रिक्षाचालकास म्हणाले.
याचा राग आल्याने रिक्षाचालकाने हुज्जत घालण्यास सुरवात केली. जयराम शहरात नवीन असल्याने त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. याचा फायदा घेऊन रिक्षाचालकाने त्यांना आयकर कार्यालयासमोर अंधारात नेत मारहाण सुरू केली. त्याचवेळी खिशातील चाकू काढून जयराम यांच्या पोटावर वार केले. यात जयराम गंभीर जखमी झाले होते.
त्यांचा शनिवारी (ता. सात) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी रिक्षाचालक मुजम्मिल रफिक कुरेशी (२२, रा. राहुलनगर, रेल्वेस्टेशन) याला अटक केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली. दरम्यान, रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न या घटनेनिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
फॅन्सी नंबरप्लेटमुळे अडकला आरोपी
पहाटे अंधारात हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे सीसीटीव्हीत रिक्षाचा संपूर्ण नंबर दिसून येत नव्हता. त्यातील केवळ १४४ हा आकडा आकर्षक पद्धतीने लिहिलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे छावणी पोलिसांनी परिवहन विभागाच्या मदतीने अशा सर्व रिक्षांचा शोध घेतला. त्यात शेवटी आकर्षकरीत्या १४४ लिहिलेल्या रिक्षावर दंड बसलेलादेखील स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी संशयित म्हणून आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चाकूचा वार झेलून स्वतः गेले रुग्णालयात
जयराम यांच्यावर चाकूने वार झाल्यावर रक्तस्त्राव सुरू होता. भल्यापहाटे रक्तबंबाळ झालेल्या जयराम यांनी मदतीसाठी अनेक वाहनधारकांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून अंदाजे ५०० मीटरवर असलेल्या रुग्णालयात स्वतः धावत घेतली. त्याठिकाणी त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. शेवटी शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
