जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती संचालकांना पत्रकारांसाठीच्या योजनांच्या नियमात सुधारणा करणे बाबत सूचनांचे निवेदन
जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती संचालकांना पत्रकारांसाठीच्या योजनांच्या नियमात सुधारणा करणे बाबत सूचनांचे निवेदन
बीड /प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखेच्या वतीने बीड जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यामार्फत माहिती व जनसंपर्क विभाग मंत्रालय मुंबईचे संचालक डॉ. गणेश मुळे यांना पत्रकारांसाठीच्या योजनांच्या नियमात सुधारणा करणे बाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात पत्रकारांच्या योजनांसाठी असलेल्या जाचक अटी काढून टाकाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद गेल्या अनेक दिवसापासून पत्रकारांसाठीच्या विविध योजनांच्या आटी आणि नियमात बदल करावेत अशी मागणी सातत्याने करत आहे. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन यात काही सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे. यात काय बदल अपेक्षित आहेत. अशा सूचना करणारे निवेदन जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत संचालक डॉ. गणेश मुळे यांना देण्यात आले या निवेदनामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी वयाची अट 58 वर्ष व अनुभवाची अट 25 वर्षे करावी. सलग तीस वर्षे सेवा ही अट रद्द केली जावी. ज्यांच्याकडे विना खंड सलग तीस वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे आणि ज्यांचे वय 58 वर्ष आहे अशा पत्रकाराला सन्मान योजनेचा लाभ दिला जावा. महाराष्ट्रात असंख्य पत्रकार असे आहेत की त्यांच्याकडे तीस वर्षांपूर्वीची कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळे पत्रकार योजना पासून ते वंचित राहतात. अशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे शिफारस पत्र ग्राह्य समजले जावे. शिवाय संबंधित पत्रकाराचे प्रतिज्ञापत्र घेतले जावे. अनेक साप्ताहिकाच्या प्रेस लाईन वर मालक, मुद्रक, संपादक, प्रकाशक म्हणून एकाच व्यक्तीचे नाव असते मुद्रक अथवा प्रकाशक म्हणून नाव आहे म्हणजे तो पत्रकार अन्य व्यवसाय करतो असे नाही. ते फक्त सोयीसाठी असते. त्यामुळे प्रकाशक आणि मुद्रक म्हणून नाव असणाऱ्यांचा तो अन्य व्यवसाय आहे असे समजू नये त्यालाही लाभ मिळावा. उत्पन्नाची अट दोन लाखावरून वाढवून ती पाच लाख करावी. सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या एखाद्या पत्रकाराचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा. पत्रकार महिला असेल तर तिच्या पश्चात तिच्या पतीला हा लाभ मिळावा. अशा सूचना करण्यात आल्या.
याशिवाय शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीबाबत काही सुधारणासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण मुदत ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून ही योजना चालविण्यापेक्षा या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जावी. त्यामुळे पत्रकारांसाठीच्या योजनांना निधीची कमतरता भासणार नाही .शंकराव चव्हाण निधीचे जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्या बैठका नियमित होत नाहीत दर दोन महिन्यांनी या ट्रस्टच्या बैठका झाल्या तर पत्रकारांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत. आरोग्य योजनेचा लाभ देताना ठराविक आजाराची मर्यादा रद्द करून ही योजना सर्व प्रकारच्या आजारासाठी लागू करावी. अनेकदा असे आढळून आले आहे की बऱ्याच पत्रकारांचे मेडिक्लेम असतात अशा पत्रकारांना त्याची सर्व ओरिजनल कागदपत्रे विमा कंपन्यांना द्यावी लागतात. परिणामतः अशा पत्रकारांना योजनेचा लाभ मिळत नाही .अशा पत्रकारांची हॉस्पिटलची झेरॉक्स कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी असलेली आधिस्वीकृती पत्रिकेची आठ रद्द केली पाहिजे. राज्यात केवळ आठ टक्के पत्रकारांकडेच आधिस्वीकृती असल्याने 92 टक्के पत्रकार या अटीमुळे योजनेच्या लाभांपासून वंचित राहतात. पत्रकारांच्या मृत्यूनंतर किमान पाच लाख रुपयांची मदत संबंधित पत्रकाराच्या पत्नीला किंवा मुलांना मिळाली पाहिजे. ही रक्कम मृत्यूनंतर एक महिन्याच्या आत तातडीने दिली जावी त्यासाठी देखील आधिस्वीकृती पत्रिकेची अट नसली पाहिजे आमची सरकारला विनंती आहे की या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी ही या निवेदनात करण्यात आली आहे.
आधिस्वीकृती धारक पत्रकारांच्या बस सवलतीसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांना मराठी पत्रकार परिषदेचे निवेदन
महाराष्ट्रातील सर्व आधी सुकृती धारक पत्रकारांना नवीन आलेल्या इलेक्ट्रॉनिक शिवाई व स्लीपर सेमी स्लीपर कोच मध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. बीड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी हे निवेदन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री आरोग्य सुविधा प्रमुख बाजीराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले निवेदनात मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस प्रवास मोफत दिला जातो. मात्र सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे नवीन इलेक्ट्रिक शिवाई बस आलेल्या आहेत. या गाड्यांना पत्रकारांसाठी मोफत बस प्रवास सवलत दिली जात नाही. याशिवाय महामंडळाच्या सेमी- स्लीपर बसलाही सवलत लागू होत नाही. महोदय महाराष्ट्रातील 25% पत्रकारही बस ने प्रवास करीत नाहीत. जे करतात त्यांची अर्थिक अडचण असते अशा पत्रकारांचा सन्मान व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. एस टी महामंडळाच्या सर्वच गाड्यांना आधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आमची विनंती आहे. शिवाई इलेक्ट्रिक गाड्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग यासारख्या सवलती उपलब्ध आहेत. मात्र फक्त पत्रकारांसाठीच या गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची सवलत नाही. आपण आपल्या स्तरावर संबंधितांना सूचना देऊन महाराष्ट्रातील आधिस्वीकृती धारक पत्रकारांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .
या दोन्ही निवेदनावर राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे ,विभागीय सचिव रवी उबाळे, बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय अरबुणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय हंगे, हल्ला विरोधी जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर , जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत , तालुका सरचिटणीस प्रचंड सोळंके आदिंच्या सह्या आहेत.
