ताज्या घडामोडी

शहरातील विविध समस्याला वाचा फोडण्यासाठी राजकिशोर पापा मोदी यांनी आपल्या शेकडो समर्थकासह नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना धरले धारेवर 

शहरातील विविध समस्याला वाचा फोडण्यासाठी राजकिशोर पापा मोदी यांनी आपल्या शेकडो समर्थकासह नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना धरले धारेवर 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

   अंबाजोगाई शहरातील विविध समस्याला वाचा फोडण्यासाठी आंबजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी आपल्या शेकडो समर्थकासह नगर परिषदेच्या  मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांना भेटून नागरिकांच्या हिताच्या विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आधारित मागण्यांचे निवेदन दिले.

    या वेळी त्यांनी शहरातील अनेक सांस्कृतिक आणि नागरी वापराच्या ठिकाणांबाबत माहितीची मागणी केली ज्या मध्ये आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, लोकनेते विलासराव देशमुख सभागृह, एपीजे अब्दुल कलाम सभागृह, सदर बाजारमधील शादी खाना, मुकुंदराज शाळेसमोरील नगरपालिका संकुले सभागृह, एलआयसी ऑफिस मागील स्विमिंग पूल ओपन स्पेस ही सर्व ठिकाणे किती वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवायला दिली आहेत? सामान्य जनतेसाठी आयोजित कार्यक्रमांना किती भाडे आकारले जाते? 2016 सालची व सध्याची दरपत्रके सत्यप्रतीसह जाहीर करावीत, अशी स्पष्ट मागणी या वेळी करण्यात आली.

   शिवाय अंबाजोगाई नगर परिषद सर्व विभागांचे वीजबिल भरते का? भरल्यास त्याचा एकूण खर्च किती आहे? या वेळी स्वच्छता विभागामार्फत शहरातील दिवाबत्ती देखभाल, कंत्राटी कामगार, साहित्य खरेदी व दुरुस्ती याचा तपशील, पाणीपुरवठा विभागाकडून कंत्राटी कामगार, तुरटी, ब्लिचिंग पावडर व साहित्य खरेदी आणि देखभालीसाठी केलेला खर्च  मागवला गेला.

    मागील तीन वर्षांत नगर परिषदेने मालमत्ता कर, पाणीपट्टी, घरपट्टी व इतर सेवा करांमधून एकूण किती महसूल वसूल केला याची माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली  असून  सध्या शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा अभियंता पद रिक्त असल्यामुळे हे तांत्रिक काम संगणक अभियंता व लिपिक पाहत असून, यामुळे योजनांमध्ये अकार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण करावे किंवा पाणीपुरवठा विभागात तात्काळ तज्ज्ञ अभियंत्याची नेमणूक करावी, अशी  मागणी यावेळी करण्यात आली.

    याशिवाय, नगरपरिषदेचे स्वच्छता कंत्राटी कामगार गेल्या तीन महिन्यांपासून पगाराविना आहेत. त्यांचे पगार तात्काळ करण्यात यावे या साठी त्यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले.

     या वेळी त्यांनी मागितली गेलेली सर्व माहीती तात्काळ जनतेपुढे यावी अन्यथा  जनतेच्या प्रश्नांवर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!