Sunday, June 8, 2025
ताज्या घडामोडी

गझल ही माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचे काम करते डॉ. संदीप गुप्ते यांचे मत

गझल ही माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचे काम करते

डॉ. संदीप गुप्ते यांचे मत

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
गझल ही माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचे काम करते असे मत ख्यातनाम मराठी उर्दू गझलकार डॉ. संदीप गुप्ते यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई येथे साधना प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे उद्घाटन म्हणून डॉ. संदीप गुप्ते बोलत होते.
येथील नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे, उद्घाटक संदीप गुप्ते, माजी संमेलनाध्यक्ष शिवाजी जवरे, पुरस्कार मुर्ती गझल गंधर्व सुधाकर कदम, डॉ. सुरेश खुरसाळे, नंदकिशोर मुंदडा, पृथ्वीराज साठे, नाना लोढम, माजी स्वागताध्यक्ष डॉ. प्रा. सदाशिव सूर्यवंशी, गझलकार प्रशांत वैद्य, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष डॉ. शुभदा राठी, सुनील जाधव, सचीव गोरख शेंद्रे हे उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. संदीप गुप्ते पुढे म्हणाले की, गझल ही माणसाला माणसाशी जवळ जोडण्याचे, जवळ आणण्याचे काम करते. मराठी गझलेने सतत संदेश वाहक म्हणून सातत्याने काम केले आहे. गझल जरी मुळची भारतीय नसली तरी ती भारतात आल्यानंतरच सजली, नटली आणि सौंदर्यवती ही झाली. इराणी सौंदर्यवती च्या डोळ्यातील काजळ म्हणजे मराठी गझल आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी गझलेने सुरेश भटांच्या काळापासून सामाजिक आशयाचा व्यापकपणा गाठला आहे. मराठी गझला या सातत्याने समाजातील घटनांवर परखड भाष्य करण्याची क्षमता असलेल्याच लिहिल्या गेल्या आहेत असे सांगत नवोदित गझलकारांंना मार्गदर्शन करताना डॉ. संदीप गुप्ते पुढे म्हणाले की, गझलेत काय म्हटलंय या पेक्षा कसं म्हटलंय याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे गझल लिहितांना नवोदित गझलकारांंनी प्रत्येक शेर कसा दमदार होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे शंभर शेर वाचल्यानंतरच एक शेर लिहिला पाहिजे असे सांगितले.
आपल्या भाषणात त्यांनी अनेक दर्जेदार मराठी गझलकारांच्या नावांचा उल्लेख करीत नवोदित गझलकारानी त्यांच्या गझलांचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले.
भारतात सर्व धर्मियांची एकूण २५ लाख पुजा स्थळे आहेत, यातुलनेत देशात शाळा आणि रुग्णालयांची संख्या फक्त ५ लाख आहे. हा क्रम उलटला झाला तर भारताची साहित्यिक आणि सामाजिक समृद्धता बदलण्यास सुरुवात होईल असं मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात गझल साधना पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या गझल गंधर्व सुधाकर कदम यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना
प्रख्यात गझलकार सुरेश भट यांच्या सहवासात राहिल्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगत
सुरेश भटांच्या काही गझल स्वरबद्ध करण्याची संधी मला मिळाली तेंव्हापासून सुरेश भट आणि मी यांनी गझलेवर काही काम करण्याचा निर्णय घेतला. सुरेश भट यांच्या भेटी नंतर मला या क्षेत्रात काम करण्याची दिशा मिळाली आणि आज मी त्यांच्याच मुळे इथपर्यंत पोहोचलो आहे.
सुरेश भट यांच्या सोबत मराठी गझल आणि मराठी गझल गायीकेचा प्रसार करण्याचे कामास माझी सुरुवात झाली. गझल गायीकीचा प्रचार आणि प्रसार हे एक मिशन आहे. ते सतत सुरू राहीले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात माजी संमेलनाध्यक्ष शिवाजी जवरे यांनी आपल्या भाषणात मराठी गझलेला खुप चांगले भविष्य आहे. आजच्या आणि कालच्या गझलेत खुप चांगले आणि आशादायक अंतर असून गझलेचे भविष्य ऊंचावणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याचा समारोप करताना प्रख्यात गझलकार संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनीया दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून आपणा सर्वांना संबोधित करताना मला खूप आनंद वाटतो आहे. कारण मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या, मराठी कवितेची, मराठी भाषेची व वाङ्गयाची जन्मभूमी असलेल्या मुकुंदराज, दासोपंत आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या या अद्भुत अंबाजोगाई नगरीत गझलकरांचा हा उत्स्फूर्त ‘एल्गार’ आपण सर्वजण पाहतो व अनुभवतो आहोत.
गजलच्या आजवरच्या अनेक संमेलनांमधून अनेक गजलकारांना गजल लिहिण्यासाठी प्रोत्साहन व ऊर्जा मिळत आलेली आहे व मी स्वतः याचा साक्षीदार आहे. संमेलनांमधील मुशायरे, परिसंवाद, मुक्त चर्चा, गजल गायनाच्या मैफली ही रसिकांसाठी केवळ एक पर्वणी नसून त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात नव्या गजलकारांना व गायकांना ऐकण्याची तसेच परिसंवाद, चर्चा-सत्रांमधून गजलेबद्दलच्या आपल्या जाणिवा रुंदावण्याची संधी गजलकार व रसिकांना या संमेलनांमधून मिळत असते.
आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मराठी गझलकार सुरेश भट यांच्या सह विविध ज्येष्ठ उर्दू आणि मराठी गझलकारांच्या गझलांचा संदर्भ देत नवोदित गझलकारांनी जास्त वाचन करुन कमी पण कसदार गझल लिहाव्यात असे आवाहन केले.
साधना सेवाभावी संस्था आणि तिचे अध्वर्यू असणारे आमचे मित्र- खरे तर जगन्मित्र- उत्साहमूर्ती दगडू लोमटे यांचे मी या संमेलनाच्या धाडसी व कल्पक आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करतो व त्यांना तहे-दिलसे शुक्रिया अदा करतो.
मराठी एल्गार गजल संमेलनाची ही परंपरा खंडित होऊ नये; तर नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने नवनवीन प्रांतांमध्ये त्यांचे आयोजन व्हावे असे माझ्याप्रमाणे सर्वच गजलप्रेमींना वाटते. माझेच शब्द मी उसने घ्यायचे ठरवले तर’
“नसे फक्त हा सोहळा अक्षरांचा
नसे बहर हा फक्त पाना फुलांचा मरुभूमी ही जीवघेण्या व्यथांची
गजल हा इथे कारवा वेदनांचा”
यापुढेही हा अद्भुत अक्षरांचा सोहळा, हा रंगीबेरंगी पानाफुलांचा बहर, हा आनंद व्यथा- वेदनांचा अलबेला कारवा अशा एल्गार संमेलनांच्या रुपाने यापुढेही नवनवीन क्षितिजांना गवसणी घालत राहील असा मला विश्वास वाटतो असे सांगितले.
आपल्या प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनात मागील भुमिका स्पष्ट केली. १९८३ साली अंबाजोगाई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात गझलकार सुरेश भट यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उडाली असतांनाच याच संमेलनात तीन तास सुरेश भट यांच्या गझलेचा कार्यक्रम घेणारं हे गाव तेंव्हापासून गझलेच्या प्रेमात पडलेले गाव आहे. त्यामुळे या गावात दुसरे गझल संमेलन या शहरात मला घेता आले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी साधना सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या आयोजनात मागील भुमिका स्पष्ट केली. १९८३ साली अंबाजोगाई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात गझलकार सुरेश भट यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उडाली असतांनाच याच संमेलनात तीन तास सुरेश भट यांच्या गझलेचा कार्यक्रम घेणारं हे गाव तेंव्हापासून गझलेच्या प्रेमात पडलेले गाव आहे. त्यामुळे या गावात दुसरे गझल संमेलन या शहरात मला घेता आले याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटनीय सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिजित जोंधळे आणि प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांनी केले तर आभार प्रा. ओम मोतीपवळे यांनी मानले.

▪️ नवोदित गझलकारांचा गौरव

या कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार हेमलता पाटील यांनी आपले वडील आणि सासरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या प्रत्येकी एक महिला व पुरुष नवोदित गझलकार यांना गझलांकुर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सागर पांपटवार आणि प्रियंका गिरी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!