*समाज संघटित होण्यासाठी सामाजिक अधिवेशनाची आवश्यकता – केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक*
समाज संघटित होण्यासाठी सामाजिक अधिवेशनाची आवश्यकता – केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- कोणत्याही समाजाच्या सामाजिक संघटनेसाठी सामाजिक अधिवेशनाची आवश्यकता असते अशी भावना देशाचे केंद्रीय नविकरण ऊर्जा मंत्री नामदार श्रीपाद नाईक यानी व्यक्त केली. ते अखिल भारतीय जयस्वाल सर्ववर्गीय महासभेच्या दहाव्या राष्ट्रीय महाधिवेशनात बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश चौधरी , संरक्षक प्रदीप जयस्वाल, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल, माजी मंत्री आमदार श्रीमती अनुपमा जायसवाल, राष्ट्रीय महासचिव अटल गुप्ता, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय जायसवाल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष राजा चौधरी, सुरेंद्रपाल अहलुवालिया चंदीगड, कुमार गौड हैदराबाद, लालचंद गुप्ता प्रमुख अखिल भारतीय कलचुरी स महासभा , श्रीमती अर्चना जायसवाल, श्रीमती सुमन राय महिला अध्यक्ष अ भा कलचुरी स महासभा यांच्यासह देशभरातून विविध गणमान्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
अखिल भारतीय जायसवाल सर्ववर्गीय महासभेच्या महाधिवेशनाची सुरुवात नाविन्यपूर्ण असा उपक्रम महारक्तदान शिबिर घेऊन करण्यात आली. व्यासपीठावर सर्वप्रथम सहस्त्रबाहु भगवान अर्जुन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर स्वागतगीत श्रीमती उषा रामधामी यांनी गायले. याप्रसंगी महासभेचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जायसवाल यांनी आगामी काळ सन २०२५- २८ साठी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजकिशोर मोदी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय ऊर्जामंत्री नामदार श्रीपाद नाईक यांनी राजकिशोर मोदी यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची तर इतर पदाधिकारी यांना त्यांच्या पदांची शपथ दिली. आपल्या मनोगतात अशोक जायसवाल यांनी आपल्या समाजाला विविध अंगांनी पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या हाती राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवताना अतिशय आनंद होत असल्याचे नमूद केले. यावेळी उपस्थित सर्व महासभेने टाळ्यांच्या गजरात राजकिशोर मोदी यांच्या नावाचे स्वागत व अभिनंदन केले. समाजातील मुलांना उच्चशिक्षित करून त्यांना मोठे व्यावसायिक तथा उद्योग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन अशोक जायसवाल यांनी केले. समाजकारण बरोबरच राजकारणात देखील आपल्या पाल्याणा पुढे येऊ देण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. या महाधिवेशनात राष्ट्रीय संरक्षक प्रदीप जयस्वाल, यांच्यासह लालचंद गुप्ता, प्रकाश चौधरी, श्रीमती अर्चना जायसवाल ,अनुपमा जायसवाल यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. या अधिवेशनाद्वारे समाज एकसंघ होत असल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करतांना नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या महाधिवेशनाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय ऊर्जामंत्री नामदार श्रीपाद नाईक यांनी उपस्थित महासभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी समाज समाज संघटित होण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक अधिवेशनाची आवश्यकता असते असे मत व्यक्त केले. त्यांनी सर्वप्रथम नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाज संघटित करणे हे अतिशय अवघड काम आहे. समाजाच्या उन्नतीसाठी समाज संघटन अतिशय महत्वाचे असून हे संघटन राजकिशोर मोदी हे अतिशय उत्तमरीत्या करून सांभाळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजात आजही अनेक उपेक्षित घटक आहेत त्यांच्या पर्यंत पोचून त्यांना देखिल समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन नामदार श्रीपाद नाईक यांनी नवनिर्वाचित टीमला केले. या कामासाठी आपण देखील सर्वांना वेळोवेळी सहकार्य करू असे आश्वासन नामदार श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी दिले.
अखिल भारतीय जाय सवाल सर्ववर्गीय महासभेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शेवटी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वप्रथम माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडले याबद्दल महासभेचे आभार व्यक्त केले. मी माझ्या कार्यशैली द्वारे या पदाला साजेसे काम करेन अशी विश्वास त्यांनी महासभेला दिला. समाजात ज्या काही उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल राहू असे अभिवचन राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी दिले. आपल्या समाजाला आर्थिक ,सामाजिक तसेच राजकिय स्थैर्य मिळवून देण्यासाठी सर्वांना एकसंघ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. समाजाला समाज जणांशी जोडण्यासाठी आपण एक पूल बनण्याचे काम करू असेही मोदी यांनी उपस्थित महासभेच्या आश्वस्त केले. शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी महासभेच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशिल राहण्याचा शब्द महासभेच्या समोर राजकिशोर मोदी यांनी दिला. महिला सशक्तीकरण करून त्यांनादेखील त्यांचे अधिकार देण्याचे कार्य आपल्या कार्यकाळात केले जाईल. समाजात युवक युवतींनी आपसी मतभेद टाळून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी राजकिशोर मोदि यांनी यावेळी बोलताना केले. आगामी काळात शिक्षण व आरोग्यासाठी कोष निर्माण करून त्याद्वारे शिक्षणापासून वंचित तसेच पैश्याविना उपचार थांबणार नाही याची दक्षता घेतल्या जाईल अशी अपेक्षा व्यासपीठावरून राजकिशोर मोदी यांनी बोलून दाखवली. माझ्या यापुढील काळात मी कसलाही हार ,तुरे , शाल असा सन्मान स्वीकारणार नसून याच पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन महासभेचे नव निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या महाधिवेशनाद्वारे केले.
या महाधिवेशनात महाराष्ट्रासह , बिहार ,राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड यासह अनेक राज्यातील जायसवाल समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित झाला होता. या अधिवेशनात युवक युवती परिचय मेळावा देखील संपन्न होऊन याद्वारे अनेक युवक युवतीच्या विवाहासाठी अनेक कुटुंब एकत्रित आल्याने हे अधिवेशन सफल झाल्याचे विविध भागातून आलेल्या समाजबांधवांच्या वतीने बोलल्या जात होते. हे महाधिवेशन संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र जाय सवाल संघटना, मराठवाडा जायसवाल संघटना व अंबाजोगाई जायसवाल संघटनेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
